150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |    150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |   

मध्यरात्रीनंतरचे तास – सलमा  |  Madhyaratritnantarche Taas – Salma  | Marathi Book Review |  Pustakanubhav

Book Page Image
पुस्तकाचे नाव: मध्यरात्रीनंतरचे तास लेखक: सलमा
प्रकाशन: मनोविकास प्रकाशन पृष्ठसंख्या: 561
मूल्यांकन:
10/10
किंमत: ₹488.00 Order Now

‘ साहेब हे न्या, साहित्य अकादमी मिळाला आहे याला ‘ असं त्यांनी सांगितलं. काहीतरी सोपं द्या वाचायला असं म्हणत आपल्या अभिरुचीवर शंका घेण्याचं समाधान देण्यापेक्षा ती कादंबरी मी साशंक मनाने विकत घेतली.

मध्यरात्रीनंतरचे तास ‘ या कादंबरीच्या मुखपृष्ठावरून काहीतरी गंभीर असणार हे निश्चित होतं. सुरुवातीलाच प्रस्तावना वाचली माझ्या आवडत्या लेखिका कविता महाजन यांची, या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार आहेच, पण कविता ताईंच्या प्रस्तावनेनंतर मनाला पटलं की दर्जाच्या बरोबरीने धगधगता जाळ असणार या पुस्तकात.

कादंबरीत तामिळ लेखिका सलमा पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीतल्या उणिवा बेपर्दा करतात. तामिनाडूमधील एका गावात कथेची सुरुवात होते. वेगवेगळ्या वयाची मुस्लिम स्त्री पात्र कादंबरीतून आपल्याला भेटतात. मग अगदी शाळकरी राबिया, मदिना पासून तरुण वहिदा, फिरदौस ते थेट वयस्कर नुराम्मा पर्यंत. पण सगळी पात्र म्हणजे जवळपास एकाच ताग्यातून विणलेले वेगवेगळ्या मापाचे कपडे. यांच्यावरची सामाजिक बंधनं, पुरुषसत्ताक समाजाने लादलेले नियम बऱ्याच प्रमाणात साधर्म्य साधणारे. पण प्रत्येकाची या सगळ्याला सामोरं जाण्याची पद्धत वेगळी, काहींनी निमूटपणे अत्याचाराला शोषणाला आदर्शवाद मानलं तर काहींनी बंडखोर वृत्तीने आपल्या आतल्या आवाजाला सारी बंधनं झुगारून प्रतिसाद दिला. काव्यात्मक गुलाबी आशावाद टाळून विखारी वास्तव मांडण्याचा प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे. या साऱ्या कोलाहलात एक मन विषण्ण करून टाकणारी शांतता आहे. ही शांतता कादंबरी पूर्ण होता होता अधिकाधिक गडद होत जाते.

माणूस हा समाजप्रिय प्राणी असला तरी शेवटी प्राणीच, आणि एकदा समाज प्रिय झाला तर मन काय म्हणतंय हे दुय्यम होत जातं. लोक ठरवतात आपल्या जगण्याची चाकोरी. लोक म्हणजे तरी कोण, तर पुढे पुढे करणारी चार पाच टाळकी, कुचाकळ्या करणारे काहीजण. देवाच्या वतीने माणसं बोलू लागली की गल्लत होते, मग एखादीला चूक की बरोबर असं तोललं जातं, गुन्हाला शिक्षा दिली जाते आणि बंड थोपवलं जातं, बहुतेकदा ती चूकच असते, स्त्री म्हणून विशिष्ट समाजात जन्म घेतल्याची चूक, कारण इथे देवही पुरुष आणि बडवेही.

या नकारात्मक परिस्थितीतही या साऱ्याला न जुमानता प्रेमाचे अंकुर फुटतात. प्रेम हेही या विस्तावातलं वास्तवच की. या वास्तवाच्या पुण्याईने धर्माचा विटाळ झाकोळला जातो काही क्षण. पण काही जात्यातले काही सुपातले हा न्याय कादंबरीभर आपल्याला दिसतो. स्त्री विरोधी वागण्याला मिळालेली समाजमान्यता, तसंच स्त्री आणि पुरुष यांची तथाकथित पापं मोजण्याच्या भिन्न फूटपट्ट्या बघून चीड आल्यावाचून राहवत नाही.

लेखिका सलमा यांच्या पहिल्याच कादंबरीने हे सारं यशस्वीरीत्या पेललं आहे. बऱ्याचदा नुसतं मत मांडून चालत नाही काही विषय जसं की धर्म वगैरे हे फार नाजूक असतात, त्या विषयी मत मांडायचं तर एक वेगळी हातोटी एक वेगळं कौशल्य लागतं, जसं की या कादंबरीत धर्माबद्दल जे काही प्रश्न वाचकांना पडतात ते इथे लहानग्या राबियाच्या तोंडी आहेत, आणि एका प्रसंगात वयस्कर नुराम्माच्या तोंडीही. त्यामुळे या प्रश्नांना पात्रांची मांडणी लक्षात घेता पात्रांबद्दल केवळ आकस किंवा पूर्वदुषितग्रह न ठेवता केवळ प्रश्न म्हणून पाहणं सोपं जातं. हा तोल लेखिकेने मस्त साधला आहे. सोनाली नवांगुळ यांनीही कादंबरीचा मूळ बाज सांभाळत उत्तम मराठी अनुवाद केला आहे, त्यामुळे कादंबरी वाचताना त्या भावविश्वाचा भाग होणं सोपं जातं. कांदबरी वाचल्यावर काही पात्र आणि त्यांच्या भावभावनांचे, अनुभवांचे निखारे डोक्यात कोंदटवाणे धुमसत राहतात हेच या कादंबरीचं यश आहे.

SHARE THIS :

Related Books (तुमच्यासाठी सुचवलेले) -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top